पर्यावरण संवर्धन काळाची गरज-आदित्य पाटील
माऊली विद्यापीठ संकुलात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त पाचशे झाडे लावण्याच्या उपक्रमाची सुरूवात
केज/प्रतिनिधी
भारताच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी स्वातंत्र्याचे रक्षण व पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज व भविष्याची मागणी असण्याचे प्रतिपादन माऊली विद्यापीठ केजचे सचिव आदित्य पाटील यांनी केले. ते ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माऊली विद्यापीठ संकुलात सरस्वती महाविद्यालय, भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झेंडावंदन कार्यक्रमात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
यावेळी सचिव आदित्य पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीमती तेजस्विनी अशोक पाटील, सौ. देविका आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रताप मोरे, प्राचार्य डॉ. गौतम पाटील, प्राचार्य विजयकुमार शिनगारे, प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरण संरक्षण व हरितक्रांतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलत यावेळी मान्यवरांच्या हस्ते संकुल परिसरात ५०० झाडांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प स्वातंत्र्य दिनी घेण्यात आला.
सरस्वती कन्या प्रशाला, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आदर्श प्राथमिक विद्यालया यांसह विविध शाखेचे ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रमेश माने, प्रास्ताविक श्री. नारायण चोले तर आभार प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती.

